Jagdish Kore पत्रकार: साेलापूर : इयत्ता बारावीची परीक्षा पुढील आठवड्यात ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाला शाळा-महाविद्यालय स्तरावर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत २० गुण आहेत.
त्यामुळे टक्केवारी जास्त मिळावी, यासाठी प्रत्येकाने परीक्षा काळातील अभ्यासाचे अचूक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा, जेणेकरून चांगल्या गुणांनी तो विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांना आहे.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील, बाहेरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक असतील, बैठे पथक व भरारी पथकांचेही परीक्षेवर लक्ष असणार, ड्रोन कॅमेरे, परीक्षा हॉलमध्ये जाताना अंगझडती होईल, अशा बाबींची भीती कोणीही बाळगू नये. प्रत्येक परीक्षेवेळी अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात कोणताही ताण न घेता चांगला अभ्यास करावा. शांत, निवांत ठिकाणी जाऊन अभ्यास करावा, मोठ्याने वाचून अभ्यास केल्यास जास्त लक्षात राहातो.
आपल्याला लक्षात ठेवायला किंवा पाठांतर करायला कठीण जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचे वाचन करुन त्यावर स्वत: नोट्स (महत्त्वाचे पॉईंट) काढा आणि त्याचे वाचन केल्यास तो प्रश्न कठीण वाटणार नाही. गणितांचा सराव करावा, विज्ञानातील प्रयोग लक्षात ठेवावेत. इंग्रजीची उत्तरे लिहिताना स्पेलिंग चुकणार नाही, याची दक्षता घ्यावी. पास होणे फार कठीण नक्कीच नाही, आता फक्त चांगली टक्केवारी मिळावी यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक चोख असणे आवश्यक आहे, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.
वेळापत्रक तयार करून परीक्षेला सामोरे जावे
विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता अत्यंत प्रसन्न भावनेने परीक्षा द्यावी. जीवनातील ही शेवटची परीक्षा नसून विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी अशा अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे कोणीही ताण न बाळगता अभ्यासाचे अचूक नियोजन, वेळापत्रक तयार करून परीक्षेला सामोरे जावे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
0 Comments