Hot Posts

6/recent/ticker-posts

वंचित घटकांचे जगणे सुकर करण्याची जबाबदारी सक्षम घटकांवर : ममता सिंधुताई सपकाळ

 Jagdish Kore (प्रतिनिधी) पुणे: समाजातील वंचित घटकांचे जगणे सुकर करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी काही मूठभर घटकांवर नव्हे तर संपूर्ण समाजाची असल्याची जाणीव हजारो अनाथांवर मायेची पाखर घालणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी करून दिली आहे. 

ममताताई या सिंधुताईंचे कार्य त्यांच्या इतक्यात ममतेने पुढे चालवीत आहेत.  संस्थेची सध्या पुण्यातील मांजरी, सासवड, शिरूर, चिखलदरा आणि वर्धा येथे पाच केंद्र कार्यरत आहेत. आपल्या मातोश्री देहाने अंतर्धान पावले असल्या तरी देखील त्यांचा आत्मा अजूनही आपल्या हजारो लेकरांमध्ये वास करून आहे आणि त्याच आपल्याकडून हे कार्य नेटाने करून घेत आहेत, अशी ममताताईंची नितांत श्रद्धा आहे. 

समाजातील वंचित घटकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. सरकार देखील विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत असते. मात्र ही जबाबदारी केवळ स्वयंसेवी संस्था आणि सरकारपुरती मर्यादित नाही. त्यांच्या प्रयत्नांना देखील मर्यादा आहे. मात्र, समाजातील सर्व सक्षम घटकांनी या प्रयत्नांना हातभार लावल्यास या प्रयत्नांचा वेग आणि व्याप्ती वाढणार आहे, असे ममताताईंनी नमूद केले. 

सिंधुताईंनी मोठ्या कष्टाने आणि धडाडीने उभे केलेले कार्य अधिक व्यापक करण्याचा ममता ताईंचा संकल्प आहे. कल्याण इंडस्ट्रीज आणि पूनावाला फाउंडेशन सारख्या संस्था या कार्याला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करीत आहेत. नोबेल आणि भारती हॉस्पिटल यांच्याकडून नियमितपणे आरोग्याच्या दृष्टीने मुलांची देखभाल व उपचार यांची काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे सिंधुताईंनी जोडलेले हजारो लोक आपापल्या परीने या कार्याला मदत करीत आहेत. 

यापुढे देखील अधिकारी लोकांनी संस्थेच्या केंद्रांवर यावे. संस्थेचे काम बघावे आणि या कामात सहभाग द्यावा, अशी अपेक्षा ममताताईंनी व्यक्त केली.

मैने आपल्या आयुष्यात अपार कष्टाने आणि असीम वात्सल्याने असंख्य माणसे जोडली. त्यांचे निधन झाल्यानंतर सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली. त्या काळात मोठ्या संख्येने हितचिंतकांनी आश्रमाला आणि अन्य प्रकल्पांना भेट दिली. माईनचे कार्य पुढे चालू राहावे यासाठी सढळ हाताने मदत देखील दिली. मात्र, काही काळानंतर कदाचित हे कार्य अनेक हितचिंतकांच्या विस्मरणात गेले असावे अथवा माईच्या नंतर हे कार्य पुढे सुरू राहील की नाही, याबद्दल काहींच्या मनात साशंकताही असेल. त्यामुळे तोपर्यंत आश्रमाचे व्यवस्थापकीय काम पाहणाऱ्या ममताताईंना बाहेर पडून लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झाली. त्या काळात लोकांसमोर जाण्याची, त्यांच्याशी बोलण्याची कला अवगत नसल्याचे ममताताई प्रांजळपणे मान्य करतात. तरीही संस्थेची गरज आणि माईंची प्रेरणा यामुळे त्या बाहेर पडल्या. लोकांपर्यंत पोहोचल्या. माईनचे कार्य तितक्याच जोमाने सुरू असल्याचे त्यांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिले. आजही त्या अथक पणाने हे कार्य करीत आहेत. आपल्या कामाची नव्याने माहिती घेऊन भेट देणाऱ्या लोकांबरोबरच जुन्या हिताचिंतकांनीही विविध प्रकल्पांना भेट द्यावी आणि या कामात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांचे आवाहन आहे.

संस्थेचे काम सध्या वाढत असून संस्थेला अधिक मोठ्या जागेची आवश्यकता आहे. सर्व केंद्रांमध्ये मिळून सध्या सुमारे तीनशे मुलांच्या निवासाची व्यवस्था आहे. केंद्रांसाठी अधिक मोठ्या जागा उपलब्ध झाल्यास अधिक संख्येने मुलांना सामावून घेता येईल, असे त्या म्हणाल्या.

माईच्या पश्चात त्यांचे कार्य पुढे चालवण्याचे मोठे आव्हान ममताताईंच्या समोर होते. ज्या ममत्वाने माई हजारोंच्या आई बनल्या ते वातावरण कायम ठेवणे गरजेचे होते. मुलांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच भावनिक आपलेपणा कायम ठेवायचा होता. त्यांच्या शिक्षणाच्या, खाण्यापिण्याच्या पद्धती बदलू नयेत. माई गेल्यावर आपण आयुष्यात दुसऱ्यांना अनाथ झालो आहोत, ही भावना मुलांमध्ये निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक होते. या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन ममताताई माईचे कार्य पुढे नेत आहेत. 

दीर्घ काळापासून समाजामध्ये अनाथाश्रम, वृद्धाश्रम असावे की नाही, याबद्दल चर्चा केली जात आहे. समाजात कोणी अनाथ असू नये. पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांची जबाबदारी त्यांच्या कुटुंबीयांनी अथवा नातेवाईकांनी घ्यावी. मुलांनी आपल्या आई बापांची रवानगी वृद्धाश्रमात न करता त्यांचा सांभाळ करावा, असा एक मतप्रवाह आहे. त्यात अयोग्य देखील काही नाही. मात्र, हा विचार आदर्शवादी आहे. तो 100 टक्के वास्तवात उतरू शकत नाही. याहून महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक आपत्तीने ज्यांच्या आयुष्यात पूर्ण अनाथपण आणून ठेवले आहे त्यांचे काय करायचे, हा यक्षप्रश्न आहे. अशा मुलांसाठी अनाथाश्रम नक्कीच उपयुक्त ठरतात. ती त्यांची केवळ अन्न वस्त्र निवारापुरती भौतिक गरज नसते तर भावनिक गरजही असते. मुलांना केवळ अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण देऊन पुरत नाही. त्यांना आपलेपणाची गरज असते. भावनिक आधाराची गरज असते. संस्काराची गरज असते. ज्या मुलांच्या या गरजा कुटुंबीय अथवा नातेवाईकांकडून पूर्ण होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आश्रम ही अत्यावश्यक बाब आहे. या ठिकाणी मुलांचे व्यक्तिमत्व उत्तमरित्या घडू शकते, असा सार्थ दावा ममताताई करतात. माई आणि त्यांच्या परिवाराच्या छत्रछायेखाली वाढलेल्या अनेकांनी अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट व अन्य क्षेत्रातून उच्च शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवले आहे. 

ममता ताईंच्या जन्माची कहाणी अत्यंत करूण आहे. त्यांचा गर्भ पोटात असताना वणवण भटकण्याची पाळी सिंधुताईंवर आली होती. त्याच अवस्थेत ममता ताईंचा जन्म जनावरांच्या गोठ्यात झाला. त्या दिवसापासून सिंधुताईंची नाळ गाईंशी घट्टपणे जोडली गेली. सिंधुताईंनी ज्या आत्मीयतेने मुला मुलींचा सांभाळ केला त्याच आपलेपणाने गाई देखील सांभाळल्या. ज्या काहींना निरुपयोगी म्हणून गोपालकांनी रस्त्यावर सोडून दिले, त्या गाईंना माईंनी आपलेसे केले. त्यांचा गोरक्षणाचा हा उपक्रम आता अधिक व्यापक स्वरूप धारण करीत आहे. वर्धा येथील केंद्रात मोठी गोशाळा असून त्यासह इतर केंद्रात मिळून 300 हून अधिक गाईंचे पालन पोषण केले जाते. 

आपले सेवा कार्य अधिक व्यापक स्वरूपात आकाराला यावे, आपल्या कार्याचा काही प्रमाणात तरी खर्च भरून काढता यावा, या उद्देशाने संस्थेने आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून 'माई बेकर्स'ची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत विविध बेकरी आणि अन्य खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि विक्री केली जाणार आहे. आपल्या प्रकल्पांच्या खर्चापैकी किमान 40 टक्के खर्च स्व कमाईतून करण्याचा ममताताईंचा निर्धार आहे.

Post a Comment

0 Comments