जगदीश कोरे (प्रतिनिधी)पुणे: दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने "भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद' रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, गंगाधर आंबेडकर, सूर्यकांत वाघमारे असित गांगुर्डे , शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, शाम सदफुले, संदीप धांडोरे, लियाकट शेख, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, उमेश कांबळे, आकाश बहुले आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री आठवले म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. काँग्रेसच्या वतीने ही याच धर्तीवर रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरपीआयच्या वतीने देखील राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 'भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद'. रॅली आयोजित करण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या युद्धविराम असला तरी देखील ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, याची जाणीव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी करून दिली आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीर जोपर्यंत भारताच्या ताब्यात येत नाही आणि पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानची आरपारची लढाई सुरूच ठेवावी, अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवाव्या*
दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत पार पाडाव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी देखील आपली आग्रही मागणी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान 15 प्रभागात आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षासाठी उपमहापौर पद मिळावे आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा आपल्या मागण्या आहेत. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून आपल्या मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील आठवले यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आगामी काळात विविध महामंडळे, जिल्हा नियोजन मंडळ यावरील नियुक्तींमध्ये देखील आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
*नरकात जायचे की स्वर्गात ते आधी ठरवा*
'नरकात स्वर्ग' निर्माण करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे. कारण एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा राऊत यांनी मागणी हास्यास्पद आहे. ही मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्या ऐवजी त्यांनी सन 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्याची तयारी करावी, अशा शब्दात आठवले यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.
*मंत्रीपद नाहीतर समाज महत्त्वाचा*
शरद पवार आणि अजित पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर प्रकाश आंबेडकर आणि मी देखील एकत्र येणे आवश्यक आहे, अशा आठवले यांच्या विधानाबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतील सर्वच गटातटांनी एकत्र यावे ही भूमिका आपण कायमच मांडत आलो आहोत. माझ्यासाठी मंत्री पद महत्त्वाचे नाही तर समाजाची प्रगती महत्त्वाची आहे. समाजाची प्रगती साधण्यासाठी सर्व आंबेडकरी गट एकत्र येत असतील तर त्याचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आनंदाने सोपवू, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचा विकास आराखडा जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभाग यांनी लवकरात लवकर सादर करावा. त्यासाठी किमान शंभर ते दीडशे एकर जागा ताब्यात घ्यावी. विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी आपण अधिकारी निधी मिळवून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही देखील आठवले यांनी दिली.
पत्रकार परिषदेनंतर आठवले यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
0 Comments