Hot Posts

6/recent/ticker-posts

वीज बिल जास्त आल्याचा राग मनात बाळगून एका तरूणाने महावितरणच्या महिला अधिकारयाची केली हत्या



पुणे प्रतिनिधी नारायण अलदार: महावितरणचे वीज बिल जास्त का आले या रागातून एका 26 वर्षीय तरुणाने महावितरणच्या महिला अधिकारयाचा खून केला असल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. 

महिला अधिकारयाची हत्या करणारया आरोपीचे नाव अभिजित पोटे असून तो बारामतीतील मोरगांव याठिकाणी राहत आहे. आरोपी अभिजीत पोटेच्या वीजेचा वापर साधारण 30 युनिट होता आणि तो वापर अधिक वाढला होता. त्यामुळे महिन्याला येणारया वीजेच्या बिलाची रक्कम सुद्धा वाढलेली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून आरोपी अभिजित पोटेला 570 रुपयांचे वीज बिल आले होते. आपल्याला महावितरणचे एवढे जास्त वीज बिल कसे काय आले? असा सवाल विचारत आरोपी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेला. 

दरम्यान महावितरण कार्यालयामध्ये दहा दिवसांपासून सुट्टी वरून पुन्हा कामावर  रूजू झालेल्या महावितरण महिला अधिकारी रिंकू बनसोडे यांना आरोपी अभिजित पोटे याने एवढे वीज बिल कसे काय आले? असा जाब विचारायला सुरुवात केली. रागाच्या भरात आरोपीने महावितरण महिला अधिकारयावर सगळ्यांसमोर कोयत्याने थेट वार करायला सुरूवात केली. महावितरण कार्यालयामध्ये हा धक्कादायक व भीतीदायक प्रकार घडला. या सगळ्या घटनेमध्ये कोयत्याचा हल्ला झाल्यानंतर महिला अधिकारी रिंकू बनसोडे गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर पुण्यातल्या एका मोठ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

महावितरण कार्यालयात अशाप्रकारे महिला अधिकारयाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने कर्मचारी व नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण महिला अधिकारी रिंकू बनसोडे यांना एक लहान मुल आहे. हया सगळ्या प्रकारामुळे त्या मुलाला आपली आई गमवावी लागली आहे. 

महावितरणचे वीज बिल रत्‍नाबाई पोटे यांच्या नावाने असल्याचे  महावितरणाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आले. त्यांचा वापर साधारणपणे 7 ते 70 युनिट पर्यंत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे स्पष्ट झाले की 26 वर्षांचा अभिजीत पोटे हा गेल्या काही काळापासून कोणत्याही प्रकारचा नोकरी कामधंदा करत नव्हता. दहावी पर्यंत शिक्षण झालेला अभिजीत पोटे हा कामधंदा म्हणून मजुरी करायचा, पण आपला हात दुखतो याचे कारण देत गेल्या काही काळापासून आरोपीने कोणत्याही प्रकारचे काम करणे बंद केले होते. या सगळ्या प्रकरणांमध्ये आपला विज बिल का वाढले याचा सवाल विचारण्यासाठी आरोपी महावितरणच्या कार्यालयात गेला असला, तरी याबाबत महावितरण कार्यालयाकडे कोणतीही तक्रार यापूर्वी आली नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. 

या प्रकारानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना लक्षात घेऊन याबाबत तातडीने दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

Post a Comment

0 Comments