जगदीश कोरे (प्रतिनिधी)ठाणे :-.महापालिका निवडणुकीसाठी राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षांची उमेदवारी मिळवण्यात पैशांचा पाऊस पडल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. त्याचवेळी आमच्याकडचे कार्यकर्ते ठाकरे बंधूंवरील प्रेमापोटी काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील जागावाटप आणि तिकीटवाटप याच्यातील घोळ शेवटच्या क्षणापर्यंत चालू होता. उमेदवारी देण्यासाठी करण्यात आलेली आर्थिक देवघेव हेच या विलंबामागचे कारण होते. उमेदवारी देण्यासाठी या पक्षांमध्ये पैशांचा पाऊस पडला, असा जाधव यांचा आरोप आहे.
निवडणूक निकालानंतर मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या महापौर पदावर मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा उमेदवारच विराजमान होईल, असा दावाही अविनाश जाधव यांनी केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांना दोन आकडी नगरसेवक संख्या गाठण्यासाठीही दमछाक करून घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
0 Comments